योगशास्त्र दिवसेंदिवस लोकप्रिय होत असताना त्यातील विविध उपशाखा किंवा अंगे विकसित होत आहेत .त्यामध्ये योग चिकित्सा ,योग संशोधन ,योग समुपदेशन यासारख्या उपशाखांचा समावेश होतो.वरील सर्व शाखांमध्ये कार्य करताना शास्त्रीय दृष्टीकोन ठेवल्यास माहितीची ,तथ्यांची कमी नाही.
माहिती कच्च्या स्वरूपात सर्वत्र मुबलक उपलब्ध असते. योग संशोधकांनी ती सचोटीने ,प्रामाणिकपणे संकलित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते . हे संकलन पुढे विश्लेषणाच्या विविध टप्प्यावर जोखून अनुमाने,निष्कर्ष मांडावे लागतात. ते निष्कर्ष पुढे साधकांच्या ,समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अवलंबले जातात .पुढे शास्त्र विकासाच्या दृष्टीने अनुमाने प्रमाणभूत मानून पुढील संशोधनाचे आधार ठरविले जातात .ते नीतीपूर्ण (Ethics ) प्रणालीस धरून असले तर संशोधन अधिक बळकट ठरते.
संशोधन कमीत कमी तथ्यांवर व घटकांवर समाधान मानून न करता अधिकाधिक नमुना संख्येवर केले पाहिजे .व्यापकपणे केले पाहिजे.त्यातील गणिती त्रुटी कमी होण्यासाठी ते उपकारक ठरते.संशोधकांनी संशोधनाविषयी माहिती जनतेसमोर सादर करताना ते अभ्यासपूर्ण रीतीने मांडले तर शास्त्राची विश्वसनीयता वाढीस लागते.विविध परिसंवादामध्ये,परिषदांमध्ये त्यावर विधायक संवाद घडेल .हि जबाबदारी यापुढील योग अभ्यासकांना घ्यावी लागणार आहे असे प्रतिपादन श्री अदियोग संस्थेचे संचालक डॉ संजय गवळी यांनी योगदर्शन २०२४ राष्ट्रीय परिषदेत समारोप प्रसंगी केले. २३-२४ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे दोन दिवसांची परिषदेची सांगता झाली .या प्रसंगी राष्ट्रीय शैक्षिक योजना व प्रशासन संस्थान दिल्ली (निएपा ) विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.शशिकला वंजारी उपस्थित होत्या .
